कोलकता – पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र, तत्पूर्वी तृणमूल कॉंग्रेस अध्यक्ष व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठे राजकीय धक्के बसताना दिसत आहेत. मागील काही दिवसांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी टीमसीची साथ सोडल्यानंतर आता, आगामी विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांनी देखील ममता बॅनर्जींविरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे अगोदरच भाजपामुळे काहीशा अडचणीत आलेल्या ममता बॅनर्जींची डोकेदुखी आता अधिकच वाढणार असल्याचे दिसत आहे.
या अगोदर ममता बॅनर्जी यांनी भाजपाविरोधात लढण्यासाठी कॉंग्रेस व डाव्या पक्षांकडे मदत मागितली होती. मात्र, दोघांनी यासाठी स्पष्टपणे नकार दर्शवला होता. तर, कॉंग्रेसच्या एक नेत्याने ममता बॅनर्जींना आघाडी करण्यापेक्षा टीएमसीचे कॉंग्रेसमध्ये विलणीकरण करण्याचाही सल्ला दिला होता. आता डाव्या पक्षांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केल्याने, ममता बॅनर्जींना बंगालमधील आपले राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.
पश्चिम बंगालला धार्मिक ध्रुवीकरणापासून वाचवण्यासाठी आम्ही भाजपा व टीएमसीविरोधात मिळून निवडणूक लढवू. आमच्यात (कॉंग्रेस व डावी आघाडी) कोणतेही गैरसमज नाहीत. जागा वाटपांवर अद्याप चर्चा बाकी आहे, असं डाव्या आघाडीचे अध्यक्ष बिमेन बोस यांनी म्हटलं आहे.