नवी दिल्ली – कॉंग्रेसने त्यांच्या काळात जेम्स बॉंड पद्धतीने हेरगिरी केली होती. पण त्यांनी आता पेगॅसस प्रकरणात खोटी व रचलेली स्टोरी पुढे केली आहे. त्यातून ते संसदेचाही वेळ वाया घालवत आहेत अशी टीका केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे. सरकारवर आरोप करायचे आणि पळून जायचे असे धोरण कॉंग्रेस व अन्य राजकीय विरोधकांनी अंगिकारलेले दिसते आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की थेट लोकांशी संबंधीत विषयांवर चर्चा करायला सरकार तयार आहे; पण असले भलतेच विषय उपस्थित करून संसदेच्या कामात अडथळे आणणे योग्य नाही. पुढील आठवड्यात संसदेचे कामकाज सुरळीत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
संसदेचे अधिवेशन सरकार गुंडाळण्याच्या तयारीत असल्याच्या वृत्ताचेही नक्वी यांनी खंडन केले. अशा अफवांना काहींही अधिकार नाही आणि पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठरल्याप्रमाणेच 13 ऑगस्टपर्यंत चालेल असे नक्वी यांनी नमूद केले. पेगॅसस प्रकरण हे बनावट असून त्यावर चर्चा करून व्यर्थ वेळ दवडण्यात अर्थ नाही असेही त्यांनी एका प्रश्नात नमूद केले. विरोधकांनी नकारात्मक भूमिकेतून हा सारा गदारोळ चालवला आहे असे त्यांनी म्हटले आहे.