नवी दिल्ली – उद्योगपती अदानी यांच्या घोटाळ्याच्या प्रकरणात कॉंग्रेस पक्षाने आरबीआय आणि सेबी या नियामक संस्थांकडे धाव घेतली आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या दोन्ही नियायक संस्थांना पत्र लिहुन अदानी गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. अदानी समुहाला सरकारी बॅंका आणि वित्तीय संस्थांकडून देण्यात आलेल्या कर्जामुळे भारताची बॅंकींग सिस्टीम अस्थिर होऊ नये याची काळजी घेण्याचीही सूचना आरबीआयला त्यांनी केली आहे.
अदानी ग्रुपने त्यांच्याच विदेशातील शेल कंपन्यांद्वारे आपल्याच कंपन्यांच्या शेअर मध्ये गुंतवणूक करून या शेअरच्या किंमती बनावट रितीने वाढवण्यात आल्या आहेत. या वाढीव रकमेचे शेअर्स सरकारी बॅंकांमध्ये तारण ठेऊन त्याद्वारे मोठे कर्ज उचलण्यात आले आहे असे सांगण्यात येत आहे. यामुळे अदानी समुहाला देण्यात आलेल्या कर्जाच्या परतफेडीविषयी साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आरबीआयने या विषयाची सारी सत्त्यता पडताळून पाहून सरकारी बॅंकांच्या पैशाच्या सुरक्षितते विषयी जनतेलाही विश्वासात घेतला पाहिजे अशी अपेक्षाही जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे.
अदानी समुहाला भविष्यातील आर्थिक चणचणीच्यावेळी पुन्हा भारतीय बॅकिंग सिस्टीममधूनच राजकीय दबावापोटी पैसे दिले जाणार नाहीत याची काळजी आरबीआय घेणार आहे काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. एलआयसी आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया या सरकारी वित्त संस्थांनी अदानी ग्रुपला कर्ज पुरवठा करताना जादाच उदारता दाखवली आहे असा आरोपही त्यांनी केला.
मंत्रिमंडळ निर्णय : महाराष्ट्रात कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची अंमलबजावणी करणार
देशहितासाठी व गुंतवणुकदारांच्या हितासाठी सरकारी वित्तीय संस्थांची अदानी उद्योग समुहातील गुंतवणूक बुडणार नाही याची सर्व शक्य ती उपाय योजना आरबीआयकडून झाली पाहिजे असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे. अशाच स्वरूपाचे पत्र रमेश यांनी सेबीच्याही अध्यक्षांना लिहीले असून अदानी समुहाच्या शेल कंपन्यांचे व्यवहार तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे.