जयपूर – कॉंग्रेस हा विचारसरणीवर आधारलेला, चालणारा पक्ष आहे. कॉंग्रेसला कुणीही कमी लेखू नये. भाजपला हरवण्याची क्षमता केवळ कॉंग्रेसमध्ये आहे, अशी भूमिका त्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी मांडली. कॉंग्रेसच्या महत्वाकांक्षी भारत जोडो यात्रेला 100 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला. त्यानिमित्त जयूपरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राहुल बोलत होते.
कॉंग्रेस पक्ष संपल्याच्या कल्पनेत अनेक जण वावरतात. पण, कॉंग्रेस कधीच संपणार नाही. आमचा पक्ष आगामी काळात भाजपला हरवेल हे माझे शब्द नोंदवून ठेवा, असे ते म्हणाले.
मागील काळात अनेक नेत्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकल्याविषयीचा प्रश्न राहुल यांना विचारण्यात आला. भाजपविरोधात लढण्याचे धाडस नसलेले जाऊ शकतात. आम्हाला त्यांची गरज नाही. कॉंग्रेसवर विश्वास असणारेच आम्हाला हवे आहेत. लाखों कार्यकर्ते हीच पक्षाची ताकद आहे, असे उत्तर त्यांनी दिले. केवळ पक्ष कार्यकर्तेच नव्हे; तर जनतेचेही कॉंग्रेसवर खूप प्रेम असल्याचे यात्रेत अनुभवल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
इतर विरोधी पक्षांपेक्षा कॉंग्रेस पक्ष वेगळा आहे. कॉंग्रेसकडे राष्ट्रीय विचारसरणी आहे. तर, प्रादेशिक पक्षांकडे राष्ट्रीय दृष्टीकोनाचा अभाव आहे. अर्थात, इतर विरोधी पक्ष महत्वाचे असल्याचे आम्ही मानतो. त्यांच्या समवेत कार्यही करतो. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने इतर विरोधी पक्षांसमवेत कार्य करायलाच हवे. त्याविषयीची रणनीती कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे निश्चित करतील, असे राहुल यांनी नमूद केले.
गुजरातमध्ये विक्रमी विजय मिळवून भाजपने सत्ता राखली. त्याउलट, कॉंग्रेसची त्या राज्यात आजवरची नीचांकी कामगिरी नोंदली गेली. गुजरातमधील नामुष्कीजनक पराभवासाठी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपला जबाबदार ठरवले. भाजपला मदत व्हावी यासाठी आप रिंगणात उतरल्याचा आरोप त्या नेत्यांनी केला. राहुल यांनीही एकप्रकारे त्या आरोपाला दुजोरा दिला. आप नसता तर कॉंग्रेसने गुजरातमध्ये विजय मिळवला असता, अशा आशयाचे विश्लेषण त्यांनी केले.