पुणे : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर परिस्थितीत नागरिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यावर भर देण्यापेक्षा थेट मदत प्रत्यक्ष पोहचवण्यावरती कॉंग्रेस पक्षाचा भर आहे. पुण्यातील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या पुढाकारातून शहर कॉंग्रेसतर्फे सांगली कोल्हापूर या भागातील पुरामुळे बाधित नागरिकांना मदत पाठविण्याचा कार्यक्रम अतिशय प्रेरणादायी असून साऱ्या महाराष्ट्रातूनच या पूरग्रस्त भागांमध्ये मदत पाठवली जात आहे त्याचा श्री गणेशा पुण्यात आबा बागुल यांच्या पुढाकाराने होत आहे. ही आनंदाची बाब आहे. असे उद्गार महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष,आमदार नाना पटोले यांनी आज काढले.
सारसबाग येथे तीन ट्रक भरून पूरग्रस्तांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम त्या ट्रकला हिरवा झेंडा दाखवला त्याप्रसंगी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम,पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे,माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी आमदार मोहन जोशी,नगरसेवक अविनाश बागवे व कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
हे मदत कार्य सांगलीतील शिरोळ, आलास, बुबनाळ, कुरुंदवाड येथे तीन दिवसांत थेट वाटप करण्यात येणार असून त्यामध्ये 2000 रेशन किट (साखर, चहापत्ती, मीठ, हळद, लाल तिखट, तांदूळ, साबण, डाळ), 1000 ब्लॅंकेट, 2000 सोलापूरच्या भाकरी व चटणी, 1000 साड्या, 3000 मास्क, 1000 सॅनिटायझर आदी साहित्य आहे.
सोबत सुमारे 50 कार्यकर्ते असून हे कार्यकर्ते मदत वाटपात सहभागी होणार आहेत शिवाय तेथील गावकऱ्यांवरती ताण येऊ नये यासाठी हे कार्यकर्ते स्वतःचे जेवण स्वतःच बनवणार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर कोणतीही जबाबदारी पडू नये याची खबरदारी देखील त्यांनी घेतली आहे. याचा बरोबर सोबत झाडू,फावडे,घमेली आदी साहित्य सोबत घेतले असून पूरग्रस्त भागांतील कचरा गाळ काढण्यात येणार असून स्वच्छता करण्याचे कामही हे कार्यकर्ते करणार आहेत.
नैसर्गिक अपत्तीवेळी मदतीला धावून जाणं यात आम्ही सदैव पुढाकार घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी देखील सांगली कोल्हापूर भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली होती तेंव्हाही मोठी मदत केली होती. आताही करत आहोत आता ही मदत गोळा करून जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार यांच्याकडे न देता आम्ही थेट नागरिकांना वाटणार आहोत त्यामुळे ती सत्वर मदत मिळेल. अशा भावना यावेळी गटनेते बागूल यांनी व्यक्त केल्या.