राहाता (प्रतिनिधी) – सत्तेत सहभागी असलेल्या कॉंग्रेसची अवस्था “डबल ढोलकी’ सारखीच झाली आहे. निर्णयाचे अधिकार नसतील, तर सत्तेत राहाता कशाला? बाहेर पडण्याची हिंमत दाखवा. राज्यातील निर्माण झालेल्या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबरच राज्यातील कॉंग्रेस नेतेही तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर आ. विखे पाटील म्हणाले, राहुल गांधींचे विधान हे दुटप्पी आहे. सरकारमध्ये राहायचे आणि आम्हाला निर्णयाचे अधिकार नाही, असे जाहीरपणे सांगायचे. मग सरकारमध्ये तुम्ही थांबलातच कशाला. तत्काळ सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत दाखवा. एकीकडे सत्तेत राहायचे, सत्तेचा मलीदा खायचा आणि दुसरीकडे निर्णयाचे अधिकार नाहीत म्हणून जबाबदारी झटकायची, असे दोन्ही बाजूने बोलायचे, असे कसे चालेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज्यात करोनाचे एवढे मोठे संकट उभे आहे. मुंबईची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. देशातील कॉंग्रेसची अवस्था डबल … 40 टक्के जनता ही एकट्या मुंबईत आहे. या महानगरात निर्माण झालेल्या परिस्थितीला सत्तेत सहभागी झालेले तीनही पक्ष जबाबदार आहेत. राज्यातील प्रत्येक घटक या संकटामुळे अडचणीत आला असताना राहुल गांधी यावर कधी बोलले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या काही व्यक्तिगत अडचणी असतील, त्यामुळे ते मातोश्री बाहेर जावू शकत नाहीत. परंतु बाकीचे मंत्री मुंबईत का थांबले नाहीत, याचे कोडे राज्यातील जनतेला उलगडलेले नाही.
राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. भावाअभावी शेती मालाची परवड झाली आहे. खरीप हंगाम समोर आला असताना नियोजन नाही. फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बैठकांचा फार्स सुरू आहे. पालमंत्रीसुध्दा औपचारिकता म्हणून जिल्ह्यात येवून फक्त आढावा घेतात. ठोस निर्णय होत नसल्याने जनतेला या सरकारकडून कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही. त्यामुळेच राहुल गांधी यांनी केलेले विधान हे फक्त लोकांची दिशाभूल करणारे असून, या निर्माण झालेल्या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच कॉंग्रेसही जबाबदार असल्याचा आरोप आ. विखे पाटील यांनी केला.
राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी
केंद्र सरकारने महाराष्ट्राला विविध माध्यमांतून 28 हजार कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या या मदतीवर टीका करण्यापेक्षा राज्यातील जनतेला तुम्ही काय दिले, याची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी आ. विखे पाटील यांनी केली.