बंगळुरू – कॉंग्रेसच्या सरचिटणीसांकडे विविध राज्यांचे प्रभारी म्हणून काम सोपवण्यात आले आहे, पण हे प्रभारी त्यांच्या राज्यात नीट काम करीत नसल्याची टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी केली आहे.
सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस मजबूत करण्यासाठी पक्षाच्या महासमिती पातळीपासूनच पक्षाची पुनर्रचना केली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. राजस्थानच्या घडामोडींच्या संबंधात बोलताना त्यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे समर्थन केले. पायलट यांच्यासारख्यांनी आपली वेळ येईपर्यंत धीर धरणे आवश्यक आहे, असे मोईली यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, अलीकडच्या काळात पक्षाने अनेक युवकांना मोठ्या संधी दिल्या. पण त्याचवेळी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, असे ते म्हणाले. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आज युवक नेत्यांकडे संयम राहिलेला नाही. पण त्यांनी धीर राखण्याची गरज आहे.
पायलट यांना मुख्यमंत्रिपद मिळू शकले असते पण त्यांनी थोडा धीर धरायला हवा होता. पायलट हे आज केवळ 42 वर्षांचे आहेत. त्यांना पक्षाने इतक्या लहान वयात लोकसभेची उमेदवारी, केंद्रीय मंत्रिपद, राजस्थानचे प्रदेशाध्यक्षपद, उपमुख्यमंत्रिपद अशी महत्त्वाची पदे दिली आहेत. पण तरीही तेथे अडचण निर्माण झाली.
अनेक वेळा पक्षाच्या प्रभारींना आपल्या अखत्यारीतील राज्यामध्ये पक्षीय पातळीवर नेमके काय चालेले आहे याची कल्पनाच नसते. जर पक्षाच्या सरचिटणीसांनी आपल्या अखत्यारीतील राज्यांकडे नीट लक्ष दिले असते तर राजस्थानसारख्या घटना टाळता आल्या असत्या असे ते म्हणाले.