मुंबई : कॉंग्रेसने देशभरात भाजप विरोधात निदर्शने सुरू केली आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईत “भारत बचाओ-संविधान बचाओ’ रॅली काढण्यात येणार आहे. शनिवार 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक पुतळ्यापर्यंत हा फ्लॅग मार्च काढण्यात येणार आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.
कॉंग्रेसच्या संविधान रॅली निमित्ताने गांधीभवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आज केंद्रातील भाजप सरकारच्या लोकशाहीविरोधी आणि संविधानविरोधी कार्यपद्धतीने देशात धार्मिक आणि सामाजिक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. देशाची लोकशाही, संविधान, व्यक्तीस्वातंत्र्य, राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव यावर केंद्र सरकारने आघात केला आहे.
स्वातंत्रय पूर्व काळात इंग्रजांनी या देशात फोडा आणि राज्य करा हे धोरण राबवले होते. तीच परिस्थिती भाजपचे केंद्र सरकार पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा भाजपा सरकार विरोधात स्वातंत्र्यलढ्याप्रमाणे लढा उभारावा लागणार आहे, असे थोरात म्हणाले. याचाच भाग म्हणून कॉंग्रेस स्थापना दिनी शनिवार 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता ऑगस्ट क्रांती मैदान येथे ध्वजारोहण करून ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी असा भारत बचाओ संविधान बचाओ फ्लॅग मार्च काढण्यात येणार आहे.
राज्यभरातही विविध ठिकाणी फ्लॅग मार्च काढण्यात येणार आहेत. लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी कॉंग्रेस कार्यकर्ते व नागरीकांनी मोठ्या संख्येन मार्चमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन थोरात यांनी केले.