चंदीगड – पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेला गोंधळ मिटण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. अशातच पक्ष श्रेष्ठींनी आज विद्यमान मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. पंजाबमध्ये पुढील वर्षी निवडणुका होणार असून निवडणुकांच्या तोंडावरच पक्षांतर्गत कलह उफाळून आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याचे व आज सायंकाळी होणाऱ्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये नव्या नेत्याच्या निवडीचे आदेश देण्यात आलेत.
तत्पूर्वी, अमरिंदर सिंग यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास पक्ष सोडणार असल्याची जाहीर घोषणाच केली होती. अशातच त्यांच्या राजीनाम्याचे आदेश देण्यात आल्याने आता ते पुढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राजीनाम्याचे आदेश आल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि खासदार मनीष तिवारी यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे.
सोनिया गांधी यांच्याशी चर्चा
शनिवारी सायंकाळी होणाऱ्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधल्याचे कळते. यावेळी त्यांनी, “अशा अपमानासह काँग्रेसमध्ये राहू शकत नाहीत,” असे म्हटल्याचे बोलले जात आहे.
अमरिंदर-सिद्धू वादाची पार्श्वभूमी
पक्षश्रेष्ठींकडून अमरिंदर सिंग यांना देण्यात आलेल्या राजीनाम्याच्या आदेशाला सिद्धू यांच्यासोबतच्या वादाची पार्श्वभूमी आहे. दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचे संघर्ष झाल्याचे मागील काही दिवसांमध्ये पाहायला मिळाले होते. पक्षातर्फे नाराज सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं होत. तसेच दोन्ही नेत्यांशी चर्चा करत राहुल गांधी यांनी हा मिटल्याचे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात हा वाद न मिटता अधिक्काच चिघळ्याचे पाहायला मिळाले.
विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’ वरचढ ठरणार?
निवडणूकपूर्व सर्वेक्षणांमध्ये पंजाबमध्ये आपची सरशी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेसला राज्यात मोठा फटका बसणार असून आप सत्तेचा प्रमुख दावेदार म्हणून पुढे येईल असं सर्वेक्षणातून सांगण्यात आले आहे.
भाजपकडूनही खांदेपालट
भाजपने गेल्या काही महिन्यांमध्ये चार राज्यांचे मुख्यमंत्री बदलले आहेत. यामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा देखील समावेश आहे. गुजरातेत पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे रूपाणी यांच्यासह त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ देखील बदलण्यात आले असून सर्व नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.