सोरभोग – कॉंग्रेसकडे आसामच्या विकासाचा कोणताही अजेंडा नाही, त्या उलट एनडीए कडे केंद्रातील सरकार आणि राज्यातील सरकार असे विकासाचे डबल इंजिन आहे, त्याच आधारे आसामचा विकास होऊ शकतो असे प्रतिपादन गृहमंत्री व भाजप नेते अमित शहा यांनी केले आहे.
आज आसामातील बारपेटा जिल्ह्यातील प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. आसामातील तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान येत्या 6 तारखेला होत असून त्याच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता.
कॉंग्रेस आसामातील कोणताही प्रश्न सोडवू शकत नाही. त्यांचे नेते राहुल गांधी हे येथे टुरिस्ट म्हणून येतात त्यांच्याकडे विकासाची कोणतीही दृष्टी नाही असा दावाही अमित शहा यांनी केला. गेल्यावेळी मी तुम्हाला राज्यात शांतता आणि स्थैर्य प्रदान करण्याची ग्वाही दिली होती. मोदींच्या नेतृत्वाखालील पक्षाने या राज्यात शांतता, स्थैर्य आणि विकास दिला आहे असे ते म्हणाले.
राज्यातील दोन टप्प्यांचे मतदान झाले आहे आणि या दोन टप्प्यातच भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे असा दावाही त्यांनी केला. पश्चिम बंगाल मध्येही दिदी जा रही है और भाजपा आ रही है असे त्यांनी नमूद केले. आसामला लागून असलेल्या पश्चिम बंगाल मध्ये भाजप किमान दोनशे जागा जिंकणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे. तुम्हाला येथे हिंसाचार पसरवणारे सरकार हवे आहे की विकासाचे डबल इंजिन असणारे सरकार हवे आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.