सोनियांच्या निवडीवर शिवराजसिंह चौहान यांचे प्रतिपादन
भोपाळ: कॉंग्रेसने अनेक चुका केल्या आणि त्यांचा वारंवार पराभव झाला. या चुकांपासून आणि पराभवांपासून कॉंग्रेस अद्याप काहीच शिकली नाही, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले आहे.
कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदावर सोनिया गांधी यांची निवड झाली त्यावर प्रतिक्रीया देताना त्यांनी हे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, आजही कॉंग्रेस पक्ष आपल्या अस्तित्वासाठी एकाच पक्षावर अवलंबून आहे. हे यातून दिसून आले आहे. आज येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
चौहान म्हणाले, अजूनही सोनिया आणि राहुल यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे असे कॉंग्रेस जणांना वाटणे आश्चर्यकारक आहे. वास्तविक पक्षाने लोकशाही प्रक्रियेतून आपला अध्यक्ष निवडायला हवा होता. पण त्यांना अजूनही ते जमत नसेल तर या पक्षाला काहीही भवितव्य नाही. भाजपमध्ये नैसर्गिकरित्या पक्षाचे नेतृत्व तयार होते. ते कोणत्याही घराण्याशी संबंधीत नसते. पण कॉंग्रेस मात्र अजून घराण्याच्या बाहेर पडायला तयार नाही, हे दुर्देव आहे.
दरम्यान कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी सोनियांची निवड झाल्याने भाजपच्या गोटात खळबळ माजली असल्याचा दावा कॉंग्रेसचे ओडिशाचे आमदार सुरेश राऊतराय यांनी केला. ते म्हणाले की, गांधी-नेहरू कुटुंबाने देशासाठी दिलेले योगदान कोणालाच विसरता येणार नाही.