नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाचा राजीनाम्याचे पत्र सादर करण्याआधी तीन दिवस मी झोपू शकलो नाही आणि आताही मला नीट झोप लागत नाही, अशी भावना कॉंग्रेस सोडलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी राहुल गांधी हे कोणाचेही ऐकत नाहीत आणि कोणालाही भेटत नाहीत असे म्हटले आहे. गेल्या नऊ वर्षापासून पक्षात मी अनेकदा सल्ला देण्याचा प्रयत्न केला पण माझा सल्ला कोणी ऐकला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
आम्ही सोनिया गांधी यांच्या विरोधात कधीच काही बोललो नाही. त्या सर्वांचे ऐकून घ्यायच्या, पण राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीविषयी तक्रारी करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही आझाद यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आज कॉंग्रेस पक्ष अस्तित्वहीन झाला असून पक्षात काहीच राहिलेले नाही आणि आता यापुढेही पक्षाचे काही भले होईल असे वाटत नाही. आता कॉंग्रेसचे अध्यक्षपद कोणाकडेही गेले तरी कॉंग्रेसमध्ये फरक पडण्याची शक्यता नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. (Congress has become non-existent, there is nothing left in the party – Ghulam Nabi Azad)