प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 13 -“भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाच्या उभारणीत गांधी-नेहरू आणि कॉंग्रेसचे योगदान मोठे आहे. याच कॉंग्रेसने देशाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक, आर्थिक, सामाजिक विकासाची पायाभरणी केलेली आहे. आज काही लोक गांधी-नेहरू आणि कॉंग्रेसमुक्त भारत अशी भूमिका मांडत आहेत. ही भूमिका भारतीय संघराज्याला धोका निर्माण करणारी आहे, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाच्यावतीने आयोजित “भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे आणि देशाच्या उभारणीत कॉंग्रेसचे योगदान’ या विषयावर खोरे बोलत होते. प्रसंगी संस्थेचे मानद अध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, सचिव प्रसाद आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे आदी उपस्थित होते.
खोरे म्हणाले, “धर्मनिरपेक्ष विचारांतून गरीब आणि शेवटच्या घटकातील माणसाला न्याय देण्याचे काम कॉंग्रेसने केले. देशाला दुर्बल करणाऱ्या धार्मिक, पंथीय, जातीय शक्ती सक्रिय झाल्याचे सध्याचे वातावरण आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत गांधी-नेहरूंचे विचार आपण अभ्यासले पाहिजेत.’
मोहन जोशी म्हणाले, “स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्योत्तर भारताचे नेतृत्व कॉंग्रेसने केले. या वाटचालीत कॉंग्रेसने देशाला वेगळ्या उंचीवर नेले आहे. धोरणात्मक, दूरदृष्टीने निर्णय घेत पंडित नेहरूंनी विकासाची मुहूर्तमेढ रोवली. इंदिरा गांधींनी भारताची शक्ती दाखवून दिली. तर एकविसाव्या शतकातील भारताचे स्वप्न दाखवण्याचे काम राजीव गांधी यांनी केले. त्यामुळे कॉंग्रेसचे योगदान कितीही झाकण्याचा प्रयत्न केला. तरी तो ठळकपणे दिसल्याशिवाय राहणार नाही.’ कल्याणी साळुंके यांनी प्रास्ताविक केले. विभा आबनावे यांनी सूत्रसंचालन केले. पुष्कर आबनावे यांनी आभार मानले.