कितीही धक्का मारला तरी विजय अशक्य
वर्धा – कॉंग्रेसचे इंजिन खराब झाले आहे. एक अध्यक्ष, पाच कार्याध्यक्ष मिळून सहा लोकांनी धक्का मारण्याचा प्रयत्न केला तरी आता कॉंग्रेसची गाडी निवडणुकीत विजयाच्या दिशेन जाऊ शकत नाही, अशी खोचक टोला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगाविला आहे.
वर्ध्यात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामाच्या भूमिपूजनाचा तसेच लोकार्पणाचा सोहळा काल रविवारी पार पडला. सेलूमधील नवीन बसस्थानकाचे भूमिपूजन, तर वर्ध्यात नवीन बसस्थानकाचे लोकार्पण मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
मुनगंटीवार म्हणाले, कॉंग्रेसने मुख्यमंत्रीपदाची कितीही स्वप्न बघितली, तरी ते स्वप्न काही क्षणच त्यांना आनंद देऊ शकते. एवढे वर्ष कॉंग्रेसची सत्ता होती आणि फक्त मोदी हटावचा नारा देऊन निवडणुकीत प्रचार फक्त कॉंग्रेसने केला. गेल्या 47 वर्षांत कॉंग्रेसने कोणतीही विकासकामे केली नाहीत. जनतेला हे माहीत आहे. त्यामुळे कॉंग्रेस आता पुढे जाऊ शकत नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
पुढचा मुख्यमंत्री महायुतीचा होणार आहे. शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांना जागा दिल्यानंतर समान वाटप होईल. जागा वाटपाबाबत एकत्रित बसून चर्चा करून ठरवणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.