चव्हाण यांचा उल्लेख करण्याचा समितीला काय अधिकार?
नगर – कॉंग्रेस नगर शहर जिल्हाध्यक्षपदाचा वाद आज पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. इच्छुकांच्या मुलाखतीसाठी आलेल्या निवड समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षपदी दीप चव्हाण असल्याचा खुलास पत्रकार परिषदेत केला. या विधानाला कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला असून या निवड समितीला हा अधिकार कोणी दिली. हे रिक्त आहे. यापदावर बाळासाहेब भुजबळ यांची निवड करावी, अशी मागणी शहरातील कार्यकर्त्यांनी केली असतांना परस्पर या समितीने चव्हाण हेच शहर जिल्हाध्यक्ष असल्याचे कसे जाहीर केले. याबाबत प्रदेश कमिटीने खुलासा करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
कॉंग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब सांळुके यांनी नियुक्ती करण्यात आली. पण शहर जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती झाली नव्हती. कॉंग्रेस विधानसभा इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यासाठी निवड समितीचे अध्यक्ष मोहन जोशी, सदस्य आ.डॉ.सुधीर तांबे यांनी शहर जिल्हाध्यक्षपद रिक्त असतांना दीप चव्हाण हे शहर जिल्हाध्यक्ष असल्याचा उल्लेख पत्रकाराशी चर्चा करतांना केला ही बाब शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मान्य नाही.
ते चव्हाण यांना अध्यक्ष मानत नाहीत. गेल्या महापालिका निवडणूक काळात दीप चव्हाण यांनी शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा आणि तो स्वीकारल्याचे स्वत: त्यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नगरमध्ये पत्रकारांना सांगितले होते. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. या पदावर बाळासाहेब भुजबळ यांची निवड करावी, अशी शहरातील बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी असूनही अल्पमतात असलेल्या चव्हाण हे अध्यक्ष पदावर कसे? असा सवाल शहर जिल्हा उपाध्यक्ष रवि सुर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे. नवे प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात यांनी चव्हाण यांची पुन्हा पदावर नियुक्ती केली आहे का? असा सवाल उपस्थित होतो.
आ.डॉ.तांबे हे पक्षात चव्हाण यांच्या शिवाय इतरांचा आणि वस्तुस्थितीचा विचार करीत नाही का? असा ही सवाल येथे उपस्थित होतो. मोहन जोशी हे पुण्याचे असून त्यांना वस्तूस्थितीची कल्पना नसेल ही आ.तांबेनी चव्हाण यांचा उल्लेख केल्याने ते तसे म्हणाले असेल तरी प्रदेश कमिटीने याबाबत योग्य तो खुलासा करावा, अशी मागणी सुर्यवंशी यांच्यासह शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, भिंगार कॉंग्रेस अध्यक्ष ऍड.रामकृष्ण पिल्ले, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष फिरोज खान, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, महिला शहर जिल्हाध्यक्ष सविता मोरे आदींनी केली आहे.