नवी दिल्ली – कॉंग्रेसने आपल्या सर्वांचे भलेच केले. आता पक्षाचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे. पक्षाला पुन्हा मजबूत करण्यासाठी कुठली जादूची कांडी उपलब्ध नाही. पक्षाच्या गतिमान पुनरूज्जीवनासाठी नि:स्वार्थ सेवा, ऐक्य, शिस्त, निष्ठा गरजेची आहे, असा कानमंत्र कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी स्वपक्षीयांना दिला.
राजस्थानच्या उदयपूरमध्ये 13 मेपासून कॉंग्रेसचे तीन दिवसीय चिंतन शिबिर होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर, येथे झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत सोनिया बोलत होत्या. चिंतन शिबिरात पक्षाचे सुमारे 400 नेते सहभागी होणार आहेत. त्या सर्वांच्याच जीवनात पक्ष केंद्रस्थानी राहिला. आपल्याला पक्षाकडून बरेच काही मिळाले.
आता अडचणीच्या काळात पक्षासाठी आपण पुढील वाटचाल करणे आवश्यक आहे. पक्षाच्या व्यासपीठांवर टीकाटिप्पणी स्वीकारार्ह आहे. मात्र, ती पक्षाचा आत्मविश्वास कमी करणारी किंवा पक्षाचे नुकसान करणारी नसावी. पक्षापुढील आव्हानांचा एकजुटीने मुकाबला करू. पक्षाचे चिंतन शिबिर केवळ सोपस्कार ठरू नये. ते वैचारिक, निवडणुकांच्या आव्हानांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने फेरबांधणी होणाऱ्या संघटनेची नांदी ठरावे. पक्षाच्या गतिमान पुनरूज्जीवनासाठी चिंतन शिबिरातून ऐक्य आणि निर्धाराचा संदेश जायला हवा, अशी अपेक्षा सोनियांनी व्यक्त केली.
कॉंग्रेसचे हात मजबूत करण्यासाठी यापुढे एकजुटीने आणि निष्ठेने वाटचाल करण्याची गरज त्यांनी त्यातून अधोरेखित केली.