नवी दिल्ली – जम्मू काश्मीरात लष्करावर आणि नागरीकांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी सरकारने आणि सरकारच्या गुप्तचर विभागाने योग्य त्या उपाययोजना त्वरीत कराव्यात अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत काल एक मेजर दर्जाचा अधिकारी शहीद झाला आणि अन्य नऊ सुरक्षा जवान जखमी झाले आहेत. तसेच दक्षिण काश्मीर मध्ये आयईडी स्फोटात दोन नागरीकही जखमी झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर ही प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी अनंतनाग येथे दहशतवाद्यांशी लढताना शौर्य दाखवत आपल्या प्राणाची आहुती देणारे मेजर केतन शर्मा यांच्या शौर्याला सलामही केला आहे. भविष्यात अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी सरकार योग्य ती उपाययोजना करील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.