दुपारी 4 वाजता कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक
नवी दिल्ली : राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच काही केल्या सुटत नाही. कारण भाजपा, शिवसेनेनंतर राष्ट्रवादीला राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक दिल्लीत होणार होती. मात्र, ही बैठक रद्द करण्यात आली असून, महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे नेते पुन्हा मुंबईकडे रवाना झाले आहेत. दुपारी चार वाजता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे.
सोमवारी शिवसेनेला बहुमत नसल्यामुळे दावा करता आला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता स्थापनेचे राज्यपालांकडून आमंत्रण मिळाले आहे. आता राष्ट्रवादी सरकार स्थापनेचा दावा करणार का? याविषयी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाच्या आमदारांची 4 वाजता भेट घेणार आहे. दरम्यान, आमदारांची बैठकीला जाण्यापूर्वी शरद पवार हे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी लिलावती रुग्णालयात गेले आहेत.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे कोणताही निर्णय फक्त राष्ट्रवादीने एकट्याने निर्णय घेऊन काहीही होणार नाही. कॉंग्रेसला निर्णय घ्यावा लागेल. कॉंग्रेससोबत आली तरच यातून मार्ग निघू शकतो. त्यासाठी आमची बैठक होणार आहे. त्यानंतर निर्णय घेऊ. स्थिर सरकार देण्यासाठी तीन पक्ष एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा करण्यात अडथळे येत होते. त्यांचे आमदार जयपूरला असल्यानं व्यवस्थित चर्चा होत नव्हती. त्यामुळं आज बैठक होणार आहे, राष्ट्रवादीचे विधानसभेतील गटनेते अजित पवार यांनी सांगितलं.