नवी दिल्ली – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील नलिनी श्रीहरन हीच्यासह सर्व सहा जणांची सुटका करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्या निर्णयाविरूध्द आता कॉंग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. केंद्र सरकारनेही यापूर्वीच या सुटकेच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
न्यायालयाच्या निर्णयाला आम्ही आव्हान देणार असल्याचे कॉंग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारने याचिका दाखल करायला केलेल्या विलंबाबद्दलहीं त्यांनी टीका केली आहे. त्यांना उशीरा सूचलेले शहाणपण असल्याचे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.
21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांची तमिळनाडूत हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील एक आरोपी नलिनी श्रीहरन 31 वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी तिची सुटका करण्यात आली आहे. तिच्या व्यतिरिक्त अन्य पाच जणांचीही सुप्रीम कोर्टाने सुटका केली आहे. मात्र या निर्णयाबाबत कॉंग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्या आणि राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी यांनी मारेकऱ्यांना माफ करावे अशी भूमिका खूप पूर्वीच घेतली होती.
मात्र ते सोनिया गांधी यांचे वैयक्तीक मत असल्याचे आणि कॉंग्रेस पक्ष त्याच्याशी सहमत नसल्याचे कॉंग्रेसने म्हटले होते. इतरही अनेक जणांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती कारण राजीव गांधी यांची हत्या हा एका व्यक्तीवरचा नाही तर देशावरचा हल्ला होता. या निर्णयामुळे जगात चुकीचा संदेश गेला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.