गुवाहाटी – आसाम मधील तमुलपुर विधानसभा मतदार संघातील बोडो लॅंड पिपल्स फ्रंटच्या उमेदवाराने प्रत्यक्ष मतदान होण्याच्या आधीच आपली उमेदवारी मागे घेऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने तेथील निवडणूक रद्द करून तेथे पुन्हा नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवा अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
या मतदार संघात 6 एप्रिलला मतदान होणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने या प्रकरणी काल सुनावणी घेतली पण त्यांनी अजून त्या विषयीचा निर्णय जाहीर केलेला नाही. या प्रकरणी खुद्द बोडो पिपल्स फ्रंट या राजकीय पक्षानेही निवडणूक आयोगाकडे तक्रार देऊन त्यांनी तेथील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते हिमंता बिस्व शर्मा यांनी बोडोलॅंड पिपल्स फ्रंटच्या या उमेदवाराबरोबर बैठक घेऊन त्यांना पक्षातून फोडल्याने शर्मा यांच्याही विरोधात कारवाई करण्याची मागणी कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. भारतीय जनता पक्षाने मतदानापूर्वीच घोडेबाजार सुरू केला आहे असा आरोप विरोधी पक्षांनी सुरू केला आहे. दरम्यान पक्षाकडून निवडणुकीसाठी कोणताच निधी मिळत नसल्याने आपण पक्ष सोडून भाजप मध्ये गेलो आहोत असे बोडोलॅंड पिपल्स पार्टीचे उमेदवार बसुमातारे यांनी पत्रकारांना सांगितले.