नवी दिल्ली – करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट देशासाठी अत्यंत घातक ठरली आहे. या लाटेत देशातील बाधितांच्या संख्येबरोबरच मृत्यूच्या संख्येनेही नकोसे विक्रम प्रस्थापित केले. अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन, रेमडीसीवीरसाठी भटकावे लागले.
दरम्यान, देशातील या बिकट परिस्थितीवरून मोदी सरकारवर चौफेर टीका करण्यात आली. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने देशातील या परिस्थितीसाठी मोदी सरकारच सर्वस्वी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप लगावला. अशातच आज भाजप नेते केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसच व्हॅक्सिन व व्हेन्टिलेटरचे राजकारण करत असल्याचा आरोप केला.
ते म्हणाले, “राजस्थानच्या आठ जिल्ह्यांमध्ये करोना लसीचे हजारो डोस वाया घालवण्यात आले. मात्र राज्यसरकारने याकडे दुर्लक्ष केले. पंजाबमध्ये केंद्राने पाठवलेले व्हेंटिलेटर धूळखात ठेवण्यात आले. काँग्रेस व्हॅक्सिन व व्हेन्टिलेटरचे राजकारण करत असताना आम्ही (भाजप) मात्र विषाणूविरोधात लढा देत आहोत.”
दरम्यान, देशातील करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख गेल्या काही दिवसांपासून खाली येताना दिसतोय. मात्र काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही संसर्गदर १० टक्क्यांहून अधिक आहे. यामुळे अनेक राज्यांनी निर्बंधांना मुदतवाढ दिली आहे.