चंडिगढ – भारत जोडो यात्रा रोखण्यासाठी मोदी सरकारकडून विविध सबबी पुढे केल्या जात आहेत. पण, यात्रा समारोपाचे ठिकाण असणाऱ्या काश्मीरला पोहचेलच, असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी म्हटले.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल यांना नुकतेच एक पत्र पाठवले. त्यामध्ये त्यांनी यात्रेत करोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. ते शक्य नसेल तर यात्रा स्थगित करण्याची विनंतीही त्यांनी केली. त्यावर राहुल यांनी हरियाणामध्ये एका मेळाव्यात बोलताना भूमिका मांडली. यात्रा रोखण्यासाठी आता सरकारने नवे कारण शोधले असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले.
देशाची ताकद आणि सत्यामुळे सरकार घाबरले आहे. ते सरकार कॉंग्रेसला आणि विरोधकांना संसदेत बोलू देत नाही. आम्ही संसदेत नोटाबंदी, जीएसटी, राफेल यांसारखे मुद्दे उपस्थित केल्यावर माईक बंद केले जातात. त्यामुळे आम्ही यात्रा सुरू केली, असे ते म्हणाले.
राहुल यांच्या नेतृत्वाखालील यात्रा सध्या हरियाणातून मार्गक्रमण करत आहे. याआधी त्या यात्रेने तामीळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगण, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राजस्थानातून प्रवास केला.