पुणे – केंद्र सरकारच्या आदेशावरून एलआयसीने अदानी समूहात गुंतवणूक केल्याचा आरोप करत केंद्र सरकारच्या निषेधार्थ “पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी’च्या वतीने अलका टॉकीज चौकातील एलआयसी बिल्डींगच्या समोर आंदोलन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने 70 वर्षात कमावलेली संपत्ती उद्योगपती मित्र अदानीला देण्याचा सपाटा लावला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी देशातील जनतेने मोठ्या कष्टाने कमावलेला आणि भविष्याची तरतूद म्हणून एसबीआय, एलआयसी मध्ये गुंतवलेले हजारो कोटी रुपये ही अदानीच्या कंपन्याना दिले. नागरिकांची ही गुंतवणूक बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. तरीही केंद्र सरकार मूग गिळून गप्प बसले आहे. असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला.
अदानी समुहातील गैरकारभारामुळे एलआयसीच्या 39 कोटी पॉलिसीधारक आणि गुंतवणूकदारांचे 33 हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे, तसेच भारतीय स्टेट बॅंक आणि इतर बॅंकांनी मिळून तब्बल 80 हजार कोटी रूपयांचे कर्ज दिले आहे. या गुंतवणुकीसंदर्भात संसदेत चर्चा व्हावी आणि गुंतवणूक दारांच्या पैशाला संरक्षण मिळावे यासाठी सरकारने योग्य ते निर्णय घ्यावा, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
या आंदोलनात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार संग्राम थोपटे, आमदार अमर राजूरकर, आमदार संजय जगताप, माजी आमदार उल्हास पवार सहभागी झाले होते. यावेळी कॉंग्रस कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
अदानी समुहातील आर्थिक गैर कारभाराचा पर्दाफाश करणाऱ्या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी व्हावी अथवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करावी. हा पैसा जनतेचा आहे. एवढा मोठा घोटाळा होऊनही पंतप्रधान आणि अर्थमंत्री गप्प आहेत हे असंवेनशीलपणाचे लक्षण आहे.
– नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस