मुंबई (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असतानाच मित्रपक्षांना मात्र 38 जागांचा प्रस्ताव मान्य नाही. आघाडीच्या मित्रपक्षांकडून 55-60 जागांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रत्येकी 125 जागांवर लढणार असून मित्रपक्षांसाठी 38 जागा सोडण्यात आल्या आहेत. तसेच उद्या कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर जागावाटपांचा आढावा घेण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी तसेच मित्रपक्षांची बैठक आज पार पडली. या बैठकीत शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहूजन विकास आघाडी आदी मित्रपक्षाचे नेते उपस्थित होते.
या बैठकीत 38 जागांना मित्रपक्षांकडून नाराजी दर्शविण्यात आली. ही नाराजी राजू शेट्टी यांच्याकडून आघाडीच्या नेत्यांपर्यंत पोहोचविण्यात आली असून 55 ते 60 जागांची मागणी करण्यात आली आहे. उद्या कॉंग्रेसकडून यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी मित्रपक्षांच्या जागांबाबतही उद्या अंतिम घोषणा होण्याची शक्यता आहे.