नवी दिल्ली – संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत उद्या (शुक्रवार) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण होईल. त्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याची घोषणा विरोधकांनी केली आहे. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी 16 विरोधी पक्षांनी संबंधित निर्णय घेतला आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन विरोधकांनी त्यांच्या आक्रमक पवित्र्याची झलक दाखवली. त्यातून विरोधक मोदी सरकारविरोधात एकवटल्याचेही सूचित होत आहे.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, तृणमूल कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, माकप, भाकप, आययूएमएल, आरएसपी, पीडीपी, एमडीएमके, केरळ कॉंग्रेस(एम) आणि एआययूडीएफ हे पक्ष राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी उपस्थित राहणार नाहीत. त्यासंबंधीचे संयुक्त निवेदन त्या पक्षांनी जारी केले.
त्यामध्ये शेतकऱ्यांना प्रतिसाद देत नसल्याबद्दल मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले. केंद्रीय कृषी कायदे मागे घेतले जावेत. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर संचलनावेळी झालेल्या हिंसाचारात सरकारची काय भूमिका होती याची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशा मागण्याही विरोधी पक्षांकडून करण्यात आल्या.