कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीला व परंपरेला साजेशी कामगिरी तुमच्या हातून घडो, अशा शब्दात पालकमंत्री सतेज पाटील यांनी यूपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव केला. नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेमध्ये चार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवून कोल्हापूरच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.
नेर्ली गावच्या डॉ. प्रणोती संकपाळ, राजारामपुरी येथील गौरी पुजारी-किल्लेदार, जवाहरनगर येथील सौरभ व्हटकर आणि पन्हाळा तालुक्यातील किसरुळ येथील अजय कुंभार यांनी घेतलेले अपार कष्ट आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मिळविलेले हे यश कोल्हापूरवासीयांसाठी अभिमानास्पद आहे, असे पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील उपस्थित होते.