नवी दिल्ली : करोनाच्या संकटातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. मोदी यांनी जाहीर केलेल्या पॅकेजचे अनेकांनी स्वागत केले. त्यांच्या या पॅकेजविषयी सार्वजनिक बँकांचे कर्ज बुडवून भारतातून फरार झालेल्या विजय मल्ल्यानेही सरकारचे अभिनंदन केल्याचे समोर आले आहे.
देशात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा करत २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. हे पॅकेज भारताला या संकटातून उठून झेप घेण्यासाठी मदत करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता.
Congratulations to the Government for a Covid 19 relief package. They can print as much currency as they want BUT should a small contributor like me who offers 100% payback of State owned Bank loans be constantly ignored ? Please take my money unconditionally and close.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) May 14, 2020
पंतप्रधान मोदी यांनी पॅकेज घोषित केल्यानंतर त्याचे अनेकांनी स्वागत केले. तर विरोधकांनी यावरून टीकाही केली होती. दरम्यान, भारतातील सार्वजनिक बँकांचे कर्ज बुडवून फरार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याने पॅकेजचे स्वागत करण्याचबरोबर मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे. करोनाशी लढा देण्यासाठी पॅकेज जाहीर केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन. सरकार इच्छा असेल तर आवश्यक तितक्या नोटा छापू शकते. पण, सार्वजनिक बँकांचे १०० टक्के कर्ज परत करण्याची ऑफर देणाऱ्या माझ्यासारख्या छोट्या मदत करू इच्छिणाऱ्याकडे (Contributor) सतत दुर्लक्ष केले पाहिजे का? माझी विनंती आहे की, कोणत्याही शर्थींशिवाय पैसे घ्या आणि हे संपवा, असे विजय मल्ल्या याने ट्विट करून म्हटले आहे.