वीज गायब झाल्याने परीक्षार्थी संतप्त
पिंपरी – महापोर्टल या वेबसाईटद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. हिंजवडीतील मारुंजी येथील अलॉर्ड कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या या ऑनलाईन परीक्षे दरम्यान वेळेत लॉगईन न झाल्याने तसेच परीक्षा सुरु असताना अचानक अनेक वेळा लाईट गेल्याने विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार घालत महापोर्टल बंद करण्याची मागणी केली. तसेच यावेळी उमेदवारांनी घोषणाबाजीही केली. त्यामुळे कॉलेजच्या आवारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राज्य शासनाच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कनिष्ठ लिपिक पदाच्या भरतीसाठी महापोर्टल या बेवसाइटद्वारे मारुंजी येथील अलॉर्ड कॉलेजमध्ये परीक्षा केंद्र आहे. येथे दोन शिफ्टमध्ये ही ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. पहिल्या बॅचची परीक्षा सकाळी दहा वाजता होती.
या बॅचमध्ये जवळ जवळ 200 विद्यार्थी होते. मात्र ऐन परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन असल्याने लॉगईन करण्यास वेळ लागत होता. तसेच परीक्षे दरम्यान अनेक वेळा लाईटही गेली, अनेक विद्यार्थ्यांचे संगणक अचानक बंद पडत होते तर काही जणांसाठी संगणकच शिल्लक नव्हते.
हा सर्व सावळा गोंधळ पाहून अखेर विद्यार्थ्यांनी वैतागून परीक्षेवर बहिष्कार घालत वर्ग सोडला. दरम्यान या गोंधळाबाबत अलॉर्ड कॉलेजचे सचिव राम यादव यांना विचारणा केली असता जनरेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आणि महापोर्टलचे सर्व्हर डाऊन असल्याने हा प्रकार घडला. त्यात कॉलेजची काहीच चूक नाही असे स्पष्टीकरण दिले. तर, या सर्व गोंधळामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून महापोर्टल परीक्षेबाबत शासनाने पुन्हा विचार करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच वारंवार होत असलेल्या या प्रकारांमुळे पालकही संतापले आहेत.
पारदर्शकतेऐवजी मनस्तापच अधिक
वर्ग तीन आणि वर्ग चारच्या पदांच्या भरतीत पारदर्शकता यावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये हे महापोर्टल सुरु केले होते. मात्र या महापोर्टलचा फायदा होण्याऐवजी विद्यार्थ्यांना मनस्तापच जास्त सहन करावा लागला. या डिजिटलमुळे विद्यार्थ्यांना अधिक फी भरावी लागली. तसेच सर्व्हर डाऊन असल्याने अर्ज भरण्यासाठी वेळ वाढला, ऑनलाईन पेमेंटसाठी वेगळे पैसे भरावे लागले. तर, महापोर्टलद्वारे एकाच पदाची परीक्षा घेण्यासाठी 24 दिवस लागले.
पोर्टल बंद करा
एका जिल्ह्यातील परीक्षार्थींना दुसऱ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्र दिले जाते या सर्व गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत महापोर्टल बंद करण्याची मागणी केली होती. मात्र महायुती सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा या गोंधळाला सामोरे जाव लागले.दरम्यान विद्यार्थ्यांच्या सर्व तक्रारी लक्षात घेता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हे महापोर्टल बंद करण्याची मागणी केली आहे. अलॉर्ड कॉलेजमधील या गोंधळावर सरकार काय तोडगा काढणार आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कोणता महत्त्वाचा निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.