कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभेच्या अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी राज्यपाल जगदीप धनकर यांच्या अभिभाषणाच्यावेळी भाजपच्या सदस्यांनी केलेल्या जोरदार गदारोळामुळे राज्यपालांना आपले भाषण अर्धवट सोडून सभागृहातून बाहेर पडावे लागल्याची घटना घडली आहे.
बंगाल मध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणाचा निषेध करीत भाजपच्या सदस्यांनी हा गदारोळ केला. राज्यपालांना आपले सर्व भाषण वाचून दाखवता येऊ नये यासाठीच ही सारी पुर्वनियोजित खेळी होती असे सांगण्यात येत आहे.
राज्यपालांनी दहा मिनीटे आधीच आपले भाषण थांबवले व ते तेथून बाहेर पडले. सभापती बिमान बॅनर्जी यांनी त्यांना त्यांच्या गाडीपर्यंत सोबत केली. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात गेले तीन वर्षे जोरदार वादंग सुरू आहे. तथापि आज मात्र त्यांच्या भाषणात भाजपकडूनच गोंधळ घातला गेला.
राज्यपाल आपल्या भाषणात पश्चिम बंगाल मध्ये निवडणुकीनंतर जो हिंसाचार झाला त्या विषयी भाष्य करतील अशी अपेक्षा होती. सरकारने हा विषय राज्यपालांच्या भाषणातून वगळला होता. पण सरकारने जे भाषण दिले आहे तेच भाषण राज्यपाल वाचून दाखवतील अशी अपेक्षा नव्हती.
कारण राज्य सरकार जे भाषण देईल तेच भाषण वाचून दाखवण्याचे आपल्यावर घटनात्मक बंधन नाही असे विधान स्व:त राज्यपालांनी सोमवारी केले होते. अशा वेळी तृणमुल कॉंग्रेस कडून सभागृहात गोंधळ घातला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
राज्यपाल धनकर हे भ्रष्ट आहेत अशी टीका सोमवारीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. व राज्यपालांना माघारी बोलवा अशी मागणी त्यांनी केंद्राकडे नोंदवली आहे. जैन हवाला प्रकरणात त्यांचे नाव आहे असा ममता बॅनर्जी यांचा दावा आहे.