नाशिक: मजुरांच्या स्थलांतराचे विदारक चित्र केंद्र सरकारला अशोभनीय आहे. हे दृश्य मन विदीर्ण करणारे आहे. मजुरांच्या स्थलांतराच्या प्रश्नांबाबत अतिशय प्रकर्षाने मी हा मुद्दा मुख्यमंत्र्यासमोर मांडला, असे म्हणत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी करोना लॉकडाऊन संदर्भातील सरकारच्या उपाययोजनांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच करोना वर्ष-दोन वर्षाचा साथीदार आहे, असे मानून हळूहळू उद्योग सुरु करायला हवेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भुजबळ म्हणाले, सतत बदलणाऱ्या निर्णयांमुळे लोकांमध्ये संभ्रम पसरत आहे. मला कुणावर टीका करायची नसून ही परिस्थिती सर्वांसाठीच नवीन असल्याने एकत्र येऊन याला तोंड देण्याची गरज आहे. सगळे हक्क कलेक्टर आणि आयुक्तांना आहेत. आम्ही सांगतो मात्र निर्णय अधिकारीच घेतात. तुम्हाला अधिकार आहेत याबाबत काही म्हणण नाही. मात्र निर्णय स्थानिक पातळीवर घेताना गोंधळ नको. सतत बदलणाऱ्या निर्णयांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. यामुळे केंद्राचे, राज्याचे आणि स्थानिक पातळीवरच्या निर्णयांमध्ये मेळ नसल्याचे त्यांनी मान्य केले आहे.
दरम्यान, पंतप्रधानांनी अचानक लॉकडाऊन घोषित केला हे चुकीचं आहे. अचानक लॉकडाऊन करण्यापेक्षा काही मुदत देऊन घोषणा केली असती तर लोकांना घरी जायला वेळ मिळाला असता. या निर्णयांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यास अडथळा निर्माण होत असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली.