रहिमतपूर – सातारा- रहिमतपूर रस्त्यावर रेल्वे क्रॉसिंगवरील पुलासाठी जमीन संपादन करताना मूळ राज्यमार्गाच्या मध्यापासून दोन्ही बाजूला समान स्वरुपात संपादन करावे व रस्त्याच्या मध्यभागी पुलाचे कॉलम उभे करावेत, अशी लोकांची मागणी असताना लोकांशी संवाद न करता “महारेल’च्या अधिकाऱ्यांनी आराखड्यात पुलाला वळण दिले आहे, अशी स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे, ते नक्की कशासाठी दिले आहे हा प्रश्न निर्माण झाला असून त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा – रहिमतपूर रस्त्याचे काम जलद गतीने चालू आहे तर रेल्वे क्रॉसिंगचे काम सुरू करण्यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत. परंतु, राज्य महामार्गावर भूमी संपादन करताना रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला समान पद्धतीने पुलासाठी व रस्त्यासाठी जमीन घेणे आवश्यक आहे, त्यानुसार काम करावे, अशी लोकांमधून मागणी होत आहे.
आजपर्यंत या परिसरातील लोकांना अधिकाऱ्यांनी विश्वासात घेतले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कामाच्या वेळेस विरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी लोकांना विश्वासात घेऊन काम सुरु करावे, अशी नागरिकांमधून मागणी केली जात आहे.
रेल्वे क्रॉसिंगवर पुलाचे काम सुरू होणार आहे, त्यास कोणाचा विरोध नाही. परंतु, ते रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस अधिकाऱ्यांनी समान जागा घ्यावी, पुलाचा संपूर्ण प्लॅन लोकांना दाखवावा, कोणावर अन्याय होणार नाही हे पाहावे.
चंदुलाल शहा