कराड – कराड नगरपालिकेत गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी गटात अनेक विविध कारणावरून मतभेद निर्माण झाले आहेत. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व गटनेते राजेंद्र यादव यांच्या गटांनी पालिकेत सवतासुभा मांडल्याचे दिसून आले.
यासाठी पालिकेतील टेंडर झोल कारणीभूत असल्याचे बोलले जात होते. मात्र, क्रेडाई संस्थेच्या बोट उद्घाटन सोहळ्यात या दोनही गटाच्या नेते मंडळींनी एकत्रित नौका विहार केला. त्यानिमित्ताने कराड पालिकेतील राजकारणाचा संगम झाल्याचे दिसून आले.
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर भाजपाच्या गोटात गेलेले गटनेते व नगरसेवक यांनी एकत्रित येत पालिकेत सत्ता स्थापन केली. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन ते अडीच वर्षात कोणत्याही वाद-विवादाशिवाय अत्यंत चांगल्या पध्दतीने कारभार सुरू होता.
मात्र, गेल्या सहा महिन्यात असे नेमके काय घडले की, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी अन्य चार सदस्यांसह आपला सवतासुभा मांडला. त्यानंतर गटनेते राजेंद्र यादव यांनी पालिकेच्या कारभारात सक्रीय होत सर्व सुत्रे हाती घेतली. याच दरम्यान, सभागृहात बसण्यासाठी स्वतंत्र जागेची मागणी करून जयवंत पाटील यांनी आपण स्वतंत्र असल्याचे कराडकरांना दाखवून दिले.
दरम्यानच्या काळात ठेकेदारांच्या अनेक बिलांवर तीन-तीन महिने सह्या होत नसल्याची कुरकूर कराडकरांच्या कानावर आली. याप्रकरणी राजेंद्र यादव यांनी लक्ष घालत तो मुद्दा निकाली काढल्याचे बोलले जात आहे. बिलावरील सह्या करण्यावरून मुख्याधिकारी डांगे व नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यातील “वॉर’ कराडकरांसाठी मनोरंजनाचे ठरले. काही कालावधीनंतर शहरातील अनेक विकासकामांची टेंडर काढून दडविल्या प्रकरणी नगराध्यक्षांसह काहींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारीही केल्या. तेंव्हापासून टेंडर प्रक्रिया गुलदस्त्यात आहे.
निसर्ग वादळ, करोनाची पार्श्वभूमी तसेच लॉकडाऊनमुळे कराड पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठका झाल्या नाहीत. तर विशेष सभासह इतर बैठकांना निरोप मिळणे यावरून सभागृहात चर्चातर झालीच शिवाय शहरवासियांमध्येही चर्चा रंगू लागली. काहींनी केलेल्या तक्रारीनंतर गुलदस्त्यात असणारी सर्व टेंडर खुली झाली. ती शहरातील तसेच अन्य ठिकाणच्या ठेकेदारांनी भरली आहेत. त्यामुळे ज्या कारणासाठी टेंडर प्रक्रिया हाईड करण्यात आली होती, तो हेतू असफल झाला आहे.
यासाठी सत्ताधारी गटातील दुफळी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, रविवारी क्रेडाई संस्थेच्या बोट उद्घाटन प्रसंगी नियोजन सभापती विजय वाटेगावकर व उपनराध्यक्ष जयंवत पाटील एकाच वाहनातून प्रीतिसंगमावर दाखल झाले. काही वेळात गटनेते राजेंद्र यादव, नगरसेवक हणमंत पवार पहिल्यापासूनच उपस्थित असलेले विरोधी पक्षनेते सौरभ पाटील यांनी एकत्रित नौका विहार केला. कराड नगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधी गटाचा संगम पाहून उपस्थितांनी भुवया उंचवल्या.
स्थायी समितीच्या सभेचा मार्ग मोकळा?
गेल्या सहा महिन्यांपासून उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व गटनेते राजेंद्र यादव यांच्या गटातील वाद अनेकवेळा सभागृहात दिसून आला. एकमेकांवर टिकाटिप्पणी झाली. हा वाद पालिकेतील विकास कामांच्या ठेक्यांवरून असल्याचे बोलले जात होते. मात्र, रविवारी पाटील-यादव यांच्यासह विरोधी गटात तिहेरी संगम झाल्याने पालिकेच्या स्थायी समितीच्या सभेचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.