ओंकार दळवी
जामखेड – अमुक तारखेला नेत्याचे पक्षांतर होणार, त्यांचे पक्षांतर म्हणून पक्षातील नेता अन्य पक्षात जाणार, पक्षांतराचा मुहूर्तही ठरला, अशा सोशल मीडियातून आणि कानोकानी सुरू असलेल्या चर्चेने पक्षांतराच्या वाटेवर असलेले नेतेच नव्हे तर संबंधित पक्षाचे कार्यकर्तेही कमालीचे संभ्रमात पडले आहेत. राजकीय गोटात पक्षांतराच्या चर्चेला प्रचंड पेव फुटले असून यातून काही नेते पक्षात राहून “मलिंद्या’ साठी श्रेष्ठींवर दबाव आणत असल्याचेही बोलले जात आहे.
जामखेड तालुक्यात जवळपास सर्वच राजकीय पक्षात गटबाजी असून, या गटबाजीतून पक्षांतर दुफळ्या व मतभेदाने डोकेवर काढले आहे. निवडणुकाजवळ आल्या की नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आवक – जावक सुरू होते. त्याच अनुषंगाने निवडणुकीचे वारे वाहू विधानसभेची निवडणूक महिन्यांवर आली आहे. राज्यभर कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील मातब्बर नेते शिवसेना-भाजपत प्रवेश करीत असल्याने हे लोण जामखेडपर्यंतही आल्याचे दिसून येते.
राष्ट्रवादीतून भाजपत जाणाऱ्यांचे प्रमाणात जास्त असताना जामखेडमध्ये भाजपतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नेत्यांचे प्रवेश होताना दिसत आहे. मतदारसंघात निवडणुकीला रंग येण्यास सुरवात झाली असून भाजपला वनवे वाटणारी निवडणूक आता रोहित पवार यांच्यामुळे दुरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजूनही उमेदवारांची नावे जाहीर झाली नसल्याने भाजपकडुन पालकमंत्री राम शिंदे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन पवार घराण्याचे तिसऱ्या पिढीतील युवक रोहित पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. राज्यात भाजपत इनकमिंग सुरू असताना मात्र या मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत.
कर्जत – जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते भाजपत जाणार, अशी जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांनी स्पष्टीकरण देऊनही ही चर्चा थांबत नसल्याने कार्यकर्तेही संभ्रमात पडले. त्यांचा प्रवेश काही दिवसांत किंवा अमूक तारखेला होणार, अशीही चर्चा सुरू आहे. मात्र या बातमीतील तथ्य समोर येण्यापूर्वीच दुसरीकडे भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी भाजपला रामराम केल्याचे जाहीर करून ना. शिंदे यांना धक्का दिला. त्यानंतर कर्जत येथील निर्धार मेळाव्यात जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांच्या भाजपचे पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड यांनी थेट राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर एंट्री करीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या समवेत पंचायत समितीच्या उपसभापती राजश्री मोरे यांनीही प्रवेश केल्याने भाजपला अर्थात ना. शिंदे यांना जोरदार पणे दुसरा राजकीय धक्का मिळाला अजूनही काही नेते पक्षांतराच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
काही दिवसांपूर्वी विद्यमान पंचायत समिती सदस्य भाजपचे नेते डॉ. भगवान मुरूमकर यांच्याबाबत देखील पक्षांतराची चर्चा होती, मात्र त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मी भाजपचा असून भाजपचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले. एकंदर पक्षांतराच्या चर्चेने तालुक्यातील नेत्यांसह कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. दुसरीकडे अमूक नेता पक्षात आल्यास आम्ही पक्ष सोडून बाहेर पडू, असा इशाराही दिला जात आहे.
काही नेते बाहेर पडण्यासाठी राज्यस्तरावरील नेत्यांना भेटून आल्याची चर्चा आहे. अर्थात श्रेष्ठींवर दबाव निर्माण करण्यासाठी असे प्रकार घडू शकतात. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराच्या उठलेल्या या वावड्या करमणुकीचा आणि तर्क – वितर्कांचा मुद्दा ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यात पक्षांतर कारणाऱ्यांच्या गुप्त बैठका सुरू आहेत. पक्षांतराची ही वार्ता संपूर्ण तालुक्यात पसरली असून कोण सदस्य, कोणत्या पक्षाचे पदाधिकारी व कोणत्या पक्षाचे नेते प्रवेश करणार अशी चर्चा तालुक्यात होत आहे.