“आत्मविश्वास’ या पाच अक्षरी शब्दाचे मानवी जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. आत्मविश्वास असेल तर अशक्य अशी गोष्ट शक्य करता येते. जर आत्मविश्वासाची कमतरता असेल, तर सहज शक्य अशीही गोष्ट अशक्य व अवघड वाटू लागते. आपण नेहमी म्हणतो की “कोशिश करनेवालों की कभी हार नही होती.’परंतु जितक्या सहजतेने आपण हे म्हणतो तितक्याच सहज आपण याचा अवलंब करतो का? बोलायला प्रेरणादायी असणारे हे वाक्य दैनंदिन जीवनात आचरणात आणतो का? याची आत्मपडताळणी आपण केली पाहिजे.
आयुष्यात जेव्हा जेव्हा कसोटीचे क्षण आपला कसं लावीत असतात तेव्हाच याची पडताळणी करणे योग्य ठरते. आज जगात अशी अनेक व्यक्तिमत्त्वे आहेत ज्यांनी यशशिखरे सातत्याने काबीज केली आहेत. मग अशा लोकांच्या यशाचे नेमके रहस्य काय? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे आत्मविश्वास. होय आत्मविश्वास.
एक असा मुलगा ज्याला मंदबुद्धी म्हणून हिणवले जात होते आणि त्याच्या बुद्धीला दूषणे देत त्याला लहानपणीच शाळेतून काढून टाकले होते. मात्र त्याच्या आईने त्याच्यावरील विश्वास डगमगू दिला नाही. त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करून त्याला घरी शिक्षण दिले आणि आज जगभरात त्या मंदबुद्धी म्हणून हिणवल्या जाणाऱ्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचे धडे पुस्तकातून दिले जातात. हे व्यक्तिमत्त्व म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन.
एक व्यक्ती ज्याला त्याच्या आवाजावरून सिनेसृष्टीतून वारंवार डावलले गेले. मात्र त्याने आपला आत्मविश्वास कदापि डळमळीत होऊ न देता प्रयत्नांची पराकाष्टा केली. आज भारतातच काय जगभरात बॉलिवूडचा बादशहा म्हणून त्यांचा गौरव केला जातो. ते व्यक्तिमत्त्व म्हणजे महानायक अमिताभ बच्चन.
अजून एक उदाहरण द्यायचे झाल्यास तामिळनाडूमधील एका छोट्याशा गावात जन्मलेला नावाड्याचा मुलगा. जो घरची परिस्थिती हलाखीची असल्याने दररोज सकाळी उठून दारोदारी वर्तमानपत्रे टाकण्याचे काम करीत असे. परंतु त्याने नेहमीच मोठी स्वप्ने पाहिली. मनात आत्मविश्वासाची ज्योत सतत तेवत ठेवली. जो पुढे जाऊन एक वैज्ञानिक झाला. परंतु तरीही संघर्षाचा काळ संपलेला नव्हता. त्याने त्याच्या सहकाऱ्यांसह बनविलेले पहिले “रॉकेट’ उड्डाण करण्यात अयशस्वी ठरले. त्यानंतर एका मिसाइलच्या प्रयत्नातही अपयशाचा सामना करावा लागला. परंतु हार मानेल तो वैज्ञानिक कसला? आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर “मिसाइल मॅन’ म्हणून लोकप्रियता मिळविली. ते म्हणजे एपीजे अब्दुल कलाम.
आपल्याला ही उदाहरणे चांगलीच माहीत आहेत. जी आपल्याला नेहमीच प्रेरणा देत असतात. परंतु यातून आदर्श घेऊन जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील कसोटीच्या काळात स्वतःला आजमावले नाही तर काहीही उपयोग होणार नाही. यासाठी आपल्यात प्रचंड आत्मविश्वास असावा लागतो. आत्मविश्वासाच्या जोरावरच आपण आपल्या हाती आलेले कोणतेही काम तडीस नेऊ शकतो. आत्मविश्वास हा केवळ प्रतिकूल परिस्थितीतच कामी येतो, असे अजिबात नाही. किंबहुना आत्मविश्वास हा वेळोवेळी आपल्या व्यक्तिमत्त्वातून प्रतीत व्हायला हवा. तो कसा ते एका प्रसंगावरून समजून घेऊया.
एका सायंकाळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आपल्या पत्नीसह जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेले. ते हॉटेल अतिशय साधे होते. एवढे मोठे व्यक्तिमत्त्व एका छोट्याशा हॉटेलला आले यावर त्या हॉटेल मालकाचा विश्वासच बसेना. हॉटेलचा मालक त्यांच्या जवळ आला. अतिशय अदबीने त्यांनी विचारले, “महोदय मी आपल्या पत्नीशी जरा खासगीत वार्तालाप करू शकतो का?’ त्यांनी लगेच होकार दिला. शेजारच्या टेबलावर दोघांत छान गप्पा रंगल्या. थोड्यावेळाने राष्ट्राध्यक्षांची पत्नी आपल्या टेबलाजवळ आल्या.
राष्ट्राध्यक्षांनी आपल्या पत्नीला विचारले, “काय गं, कोण होता तो माणूस आणि काय बोलला एवढा तुझ्याशी खासगीत?’ त्या म्हणाल्या, “अहो, तो माझा कॉलेज फ्रेंड आहे. मला ओळख पटवून देण्यासाठी त्याने खासगीत बोलावले होते. त्याला तरुणपणी माझ्याशी लग्न करायचे होते परंतु मी त्याला होकारच दिला नाही.’त्यावर मिश्कीलपणे हसत आपल्या पत्नीला म्हणाले, “अगं करायचं ना मग त्याच्याशी लग्न, आज तू या हॉटेलची मालकीण झाली असतीस.’
त्या अतिशय शांतपणे उत्तरल्या, “अजिबात नाही, माझे जर त्याच्याशी लग्न झाले असते तर आज तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असता.’राष्ट्राध्यक्षांनी आपल्या पत्नीच्या या विधानाला हसून दिलखुलासपणे दाद दिली. त्यांनतर त्यांच्या आत्मविश्वासाचे कौतुकही केले.
आत्मविश्वास असा असावा. आपल्या बोलण्या-चालण्यात, वागण्यात,कृतीत आणि विचारांतून तो नेहमी प्रतिबिंबित व्हायला हवा. आत्मविश्वासाने आपल्याला लोकांची मने जिंकून घेता आली पाहिजेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आत्मविश्वासाने यशाचा मार्ग सुकर करता आला पाहिजे. आत्मविश्वास संकुचित न ठेवता तो वेळोवेळी आपल्या आचारातून-विचारातून दर्शविला पाहिजे.
व्यक्तिमत्त्व
सागर ननावरे