सातारा (प्रतिनिधी) –पंधराव्या केंद्रीय वित्त आयोग शिफारस समितीच्या सदस्यपदी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांची नियुक्ती झाली आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधून राज्याचे प्रतिनिधी म्हणून कबुले यांची निवड करण्यात आली आहे.
या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना 80 टक्के, जिल्हा परिषदेला 10 टक्के व पंचायत समितीला 10 टक्के असा 100 टक्के निधी मिळणार आहे. ग्रामपंचायतींनी गावपातळीवर विकास आराखडे तयार केले आहेत. या आराखड्यामध्ये असणाऱ्या कामावरच 15 व्या वित्त आयोगाचा निधी खर्च होणार आहे. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समितीचा प्रत्येकी 10 टक्के निधी कोणत्या कामांवर खर्च करावयाचा याबाबत कोणत्याही सूचना जिल्हा परिषद व पंचायत
समिती प्रशासनाला आल्या नाहीत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निधीबाबत केंद्र शासनाने आराखडा बनविण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार उदय कबुले यांची ही नियुक्ती केली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीचा आराखडा तयार करताना लोकांना नागरी सुविधा मिळण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. करोनासारख्या संकटाबाबत लोकांना आरोग्य सुविधा व अन्य उपाययोजना मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याने ग्रामीण भागाचा आणखी विकास करण्याची संधी मिळाली आहे.
उदय कबुले,अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा.