कोल्हापूर – पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांचे खूप नुकसान झाले आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान पूर बाधितांना लवकरात लवकर वितरित होण्यासाठी पूरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे पारदर्शकपणे करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.
इचलकरंजी परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी करुन पूरग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजी नगरपरिषदेच्या सभागृहात पूरपरिस्थितीबाबत आढावा बैठक झाली.
यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजूबाबा आवळे, इचलकरंजी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऍड अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार शरद पाटील, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल तसेच पदाधिकारी, अधिकारी, पूर बाधित नागरिक उपस्थित होते.
जिल्ह्यात यावर्षी विक्रमी पाऊस झाल्यामुळे गंभीर पूरस्थिती झाली. पुराच्या पाण्याचा धोका असणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत राज्य शासन धोरणात्मक निर्णय घेईल, असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, भविष्यात पूर परिस्थितीमुळे नागरिकांचे नुकसान होवू नये, यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. नाल्यांचे रुंदीकरण करण्याबरोबरच नदी-नाल्यांमधील अतिक्रमण काढणे आवश्यक आहे. तसेच नद्या व ओढ्यांवरील पुलाखालून पाण्याचा प्रवाह सुरळीतपणे होण्यासाठी कमानी बांधणे आवश्यक आहे. सध्या पुरबाधित क्षेत्रात तात्पुरत्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करा.
कायमस्वरूपी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांचा व कामांचा आराखडा नगरपरिषदेने लवकरात लवकर सादर करावा. पूरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याला प्राधान्य द्या. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल. पंचनामे होताना नागरिकांनीदेखील प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पाणी ओसरेल तसे स्वच्छता विषयक कामे करुन घेणे गरजेचे असून सध्या कोल्हापूर शहरात कार्यरत असणाऱ्या टीमच्या माध्यमातून इचलकरंजीतील साफसफाईची कामे करण्याला प्राधान्य दिले जाईल. पुराच्या पाण्याचा धोका वारंवार इचलकरंजीकरांना बसतो, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी विचार केला जाईल, असे सांगून इचलकरंजीकरांच्या मदतीसाठी आणि सहकार्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
इचलकरंजीकरांना पूरपरिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सब मर्शिबल पंप देण्यात येतील, येथील वीज पुरवठा खंडित होवू नये, यासाठी उपाययोजना करणे, पूरबाधितांचे स्थलांतरण करणे, आदी प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, पूरग्रस्तांना या संकटातून कायमस्वरूपी सोडवण्यासाठी त्यांचे सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन होणे गरजेचे आहे. पुराच्या पाण्याने वेढलेल्या गावांतील लोकांचे अतोनात नुकसान होते, यासाठी येथील सर्व लोकांना नुकसान भरपाई मिळायला हवी. यासाठीच्या नियमावलीत बदल होणे गरजेचे आहे. पूर परिस्थितीमुळे या भागातील यंत्रमागधारक व कामगारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्यांनाही आर्थिक मदत देणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करून कोल्हापूर जिल्ह्यातील पूर बाधित नागरिकांना अधिकाधिक मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार व राज्य शासनाकडून अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी मिळून पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, इचलकरंजी परिसरातील नागरिक, यंत्रमागधारक, कामगार व शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान झाले आहे. अनेक पाणंद रस्ते उखडून गेले. नदीलगतच्या डांबरी रस्त्यांचेही नुकसान झाले. पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी ठोस उपाययोजना व्हायला हव्यात. येथील पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग व अन्य विभागांशी संबंधित प्रश्न गतीने मार्गी लागावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.