आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीचे हे सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यानिमीत्त माऊली मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त दि. 16 ते 19 सप्टेंबर या काळात शेकडोंच्या संख्येने सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण करण्यात आले. ज्ञानेश्वरी लेखी पारायण समितीचे बाळासाहेब महाराज खरमाळे, संतोष म. पायगुडे, प्रेमानंद म. शास्त्री, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, विकासानंद म. मिसाळ, नृसिंह म. पांचाळ यांनी हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. आंबेगाव अवसरीचे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, भरत ढोबळे, अशोक ढोबळे यांनी भाविकांना अन्नदान केले.
हजारो भाविकांनी स्वहस्ताक्षरात लिहिली ज्ञानेश्वरी –
श्री ज्ञानेश्वरी लेखीपारायण समितीच्या वतीने माऊलींच्या 725 व्या समाधी वर्षानिमित्त स्वहस्ताक्षरात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे लिखाण करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात हजारो भाविकांनी सहभाग घेऊन दररोज 25 ओव्या लिहून वर्षभरात ज्ञानेश्वरीचे लेखन पूर्ण केले. अथर्व बाळकृष्ण मोरे, मिनाक्षी जांभळकर, मधुकर पांचाळ, संतोष म. सांगळे, एकनाथ सोनवणे यांसह हजारो भाविकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.