सातारा – लॉकडाऊनपासून सर्वच क्षेत्रातील कलाकारांचे कार्यक्रम बंद झाल्याने गेले सहा महिने कलाकार व त्यांच्या कुटुंबांची उपासमार होत आहे. प्रशासन आणि मंत्र्यांना भेटूनही दखल घेतली जात नसल्याने कलाकार महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी शंखध्वनी आंदोलन करण्यात आले.
याबाबत संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अनिल मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कलाकार आपली कला सादर करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात. गेल्या वर्षभरात कलाकारांवर अनेक संकटे आली. जगभरात करोनाने थैमान घातल्याने लॉकडाऊन करण्यात आला.
यात्रा, जत्रा, लग्नसमारंभ, गणेशोत्सवात सर्व क्षेत्रातील कलाकारांचे कार्यक्रम बंद झाले. कलाकारांनी घरातच बसून प्रशासनाला सहकार्य केली. गेले पाच-सहा महिने कार्यक्रमांवर बंदी असल्याने कलाकार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना निवेदने देऊन, भेटून कलाकारांच्या व्यथा मांडल्या. कलाकारांना राज्य शासनाने मदत जाहीर करावी यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना विनंती केली होती.
मागण्या मान्य न झाल्याने 24 ऑगस्टला कोल्हापूरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “ढोल बजाओ’ आणि 4 सप्टेंबरला रास्ता रोको आंदोलन केले. सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत मदत जाहीर न केल्यास 4 ऑक्टोबरला विधान भवनासमोर आक्रोश आंदोलन करण्यात येईल.