बुध (प्रतिनिधी) -चेंबूरहून एकाच गाडीत आलेल्या पाच जणांचा अहवाल पॉंझिटिव्ह आल्याने चिंचणीसह ग्रामीण परिसरात भीतीचे वातावरण असून गाव काळजीत आहे. या रुग्णांमध्ये एकाच कुटुंबातील चौघे तर पहिल्यांदा सापडलेल्या युवकाच्या वडिलांचा समावेश आहे.
चेंबूर येथून दि. 20 मे रोजी हे सात जण क्वॉलिस गाडीने शिरवळपर्यंत आले. त्यांच्या पाठीमागे त्याच गावातील चौघे मोटारसायकलवरून येत होते. शिरवळमध्ये त्यांची गाठ पडली. त्यानंतर त्या मोटारसायकलवरील दोघेजण त्या गाडीत बसून सर्वजण चिंचणी येथे आले. त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले. दि. 21 रोजी 21 वर्ष वयाच्या मुलाला ताप आल्यामुळे सातारा येथे उपचारासाठी पाठविले. शनिवारी रात्री त्या युवकाचा अहवाल पॉझिटिीव्ह आल्यामुळे चिंचणीकरांची झोप उडाली. प्रशासनाला माहिती मिळताच डिस्कळ प्राथमिक आरोग्य केंदाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी पवार, डॉ. पराग रणदिवे, मंडलाधिकारी अमृत नाळे, तलाठी अमोल जाधव, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा यांनी चिंचणी येथे पाहणी केली. युवकाच्या संपर्कातील आठ जणांना पुसेगावला पाठविले. तर दोघांना क्वारंटाइन केले. तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनुस शेख, सपोनि विश्वजित घोडके, मंडलाधिकारी अमृत नाळे, तलाठी अजय जाधव, ग्रामसेवक घाडगे, पोलीस पाटील गणेश शिपटे, सरपंच संगीता सुनील घोरपडे यांनी भेट देऊन गाव सील केले. डिस्कळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा यांनी घरोघरी सर्व्हे केला.