केंदुर (प्रतिनिधी) – खेड आणि शिरूर तालुक्याचं नंदनवन करणाऱ्या चासकमान धरणाचा पाणीसाठा फक्त १८ टक्के शिल्लक आहे. गेल्या वर्षी मात्र आजच्या दिवसापर्यंत ९९ टक्के इतका पाणीसाठा होता त्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.
चासकमान धरणामुळे खेड आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सुबत्ता आली, दर वर्षी जुलैच्या अखेर आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच धरण निम्म्याहून अधिक प्रमाणात भरलेले पाहायला मिळते. धरणात ७५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा तयार झाला, की दोन्ही तालुक्यातील शेतकरी आनंद व्यक्त करतो. मात्र यावर्षी पावसाने जून महिन्यात हजेरी लावून पुन्हा पावसाने लपंडाव सुरू केल्याने धरणात अवघे १८ टक्के पाणी जमा झाले आहे.
दर वर्षी चासकमान धरणाच्या पाण्यासाठी कालव्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो, १०० टक्के धरण भरले तरी लोकप्रतिनिधींच्या राजकीय स्वार्थासाठी काही शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. धरण भरल्यानंतरही नियोजनच्या अभावामुळे करंदी, जातेगाव, शिक्रापूर, पिंपळे जगताप, वाजेवाडी, सणसवाडी या गावांतील शेतकऱ्यांना पाणी मिळविण्यासाठी आंदोलन करावे लागते. तरीही या शेतकऱ्यांची तहान भागवली जात नाही, याउलट आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांचा धाक दाखवून त्याचबरोबर गुन्हे दाखल करून पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांना हुसकावून लावले जाते.
स्थानिक पदाधिकारी मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत नाही, त्यामुळे नेहमी निवडणूकीच्या दरम्यान मते मागण्यासाठी येणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधात शेतकरी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे बोलले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून चासकमान धरणाच्या पाण्याचा प्रश्न या गावांना सतावत आहे मात्र यात स्थानिक पदाधिकारी नेत्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून या प्रश्नाकडे नेहमीच दुर्लक्ष करत असतात.
दरम्यान या भागातील शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या सुरुवातीला चासकमानच्या हक्काच्या पाण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून लढा सुरू केला होता. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी हे आंदोलन धुडकावून लावले, आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. यावेळी पोलिस प्रशासनाचा वापर केला.
लॉकडाऊनच्या काळात दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यापर्यंत हे आंदोलन पोहचले आणि अखेर शेतकऱ्यांचा लढा यशस्वी झाला आणि मे महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांना पाणी मिळाले.
शेतकऱ्यांनी एवढे मोठे आंदोलन छेडले मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली होती किमान यापुढे तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या पाणी प्रश्नाकडे लक्ष घालावे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
दरम्यान, गेल्यावर्षी मुबलक पाणीसाठा उपलब्ध असूनही पाण्यासाठी संघर्ष करावा लागला, अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. मात्र यावर्षी धरणातच पाणी शिल्लक नसल्याने यावर्षी देखील पाण्यासाठी पुन्हा वणवण करावी लागते की काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित झाला आहे.