मुंबई – करोना काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या जवळपास 90 हजारांच्या आसपास कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहेत. या आदेशाची काही जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी करण्यास सुरुवात देखील झाली आहे. एसटी महामंडळाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
या निर्णयाला कर्मचारी संघटना इंटकने विरोध दर्शविला आहे. देशातील आणि राज्यातील कोणत्याही महामंडळात अथवा शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा नाही तर एसटी कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा कशासाठी अशी विचारणा देखील इंटकच्या वतीने करण्यात आली आहे.
मंदीच्या नावाखाली 20 दिवस सक्तीची रजा कर्मचाऱ्यांना देण्याचा एसटी महामंडळाचा अजब फंडा आहे.
सध्या कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे 50 टक्के वेतन देण्यात आले आहे. तर जून महिन्याचा पगार अद्याप देण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत 20 दिवसांची अर्जित रजा असताना देखील सक्तीने रजा देण्यात आलेली आहे. जर पैसे द्यावेच लागणार आहेत, तर मग हा निर्णय का घेण्यात आला आहे, असा सवाल कर्मचारी उपस्थित करत आहेत.