भाईंदर – संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन परिक्षेत्रातील सीमेवरील संरक्षक भिंत पडल्यामुळे मीरा रोडच्या माशाचा पाडा, डाचकूल पाडा, मांडवी पाडा या गावात बिबट्यासह इतर वन्य तसेच हिंसक प्राण्यांचा मुक्त संचार वाढला असून त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन परिक्षेत्रात मीरा रोडचा माशाचा पाडा, डाचकूल पाडा, मांडवी पाडा तसेच या परिसरातील काही छोटे छोटे पाडे व भोवतालचा डोंगराळ परिसर येतो.
जंगल भागात आदिवासी तसेच परिसरात अन्य वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेवर वन विभागाने संरक्षक भिंती बांधल्या आहेत. या भिंती अनेक वर्षांपूर्वी बांधल्या असल्याने आता त्याची स्थिती खराब झाली आहे. काही ठिकाणच्या भिंती कोसळल्या आहेत, तर काही डबघाईस आल्या आहेत. तर अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत पडल्या आहेत. त्यामुळे बिबट्यासह अनेक वन्य प्राणी सहजपणे पाड्यात येऊन मुक्तपणे संचार करत आहेत.
त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. म्हणून या भागातील मनसेचे पदाधिकारीनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक व संचालक यांची भेट घेऊन तुटलेल्या संरक्षक भिंतीची पुनर्बांधणी करावी तसेच कोसळलेल्या भिंतीची दुरुस्ती करावी अशी पत्राद्वारे निवेदन देऊन विनंती केली आहे.