काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण
मुंबई : सीएए आणि एनआरसी विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज “भारत बंद’ची हाक देण्यात आली. या बंदमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये रस्त्यावर उतरून नागरिकांनी सीएए व एनआरसीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. तर एकदोन ठिकाणी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला.
बहुजन क्रांती मोर्चाने सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी याविरोधात आज भारत बंदची आज हाक दिली आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. मंगळवारी महाराष्ट्रातील व्यापारी संघटनांनी कुठल्याही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचा ठराव केला. त्याचाही या बंदवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.
यवतमाळमध्ये दिवसभरात तीनदा पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. सकाळी अग्रसेन चौकात व्यापाऱ्यांनी बंदला विरोध केल्यानंतर आंदोलक कार्यकर्त्यांनी दुकानात शिरून दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. शिवाय दगडफेक केल्याने वातावरण चिघळले होते.
यावेळी व्यापारी आणि बहुजन क्रांती मोर्चार्चे कार्यकर्ते आमने सामने आल्याने दोन्ही गटात वाद झाला. व्यापाऱ्यांनी दुकान बंद करावे म्हणून आंदोलकांनी गोंधळ घालीत दुकानातील साहित्याची नासधूस सुरु केल्याने व्यापाऱ्याने मिरची पावडर भिरकावून आंदोलकांना पळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि सौम्य लाठीमार केल्याने आंदोलक पसार झाले.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातही बंदला हिंसक वळण लागले. शिरपूर-पानसेमल या बसवर आंदोलकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत दोन प्रवासी जखमी झाले. तर अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात संतप्त जमावाने एका खासगी मालवाहू वाहनाच्या काचा फोडल्यात. तसेच ट्रक जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला. तर काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या.
त्यामुळे या जमावाला पांगविण्यासाठी पोलीसांना लाठीमारही करावा लागला. पालघरमध्येही पोलिसांना आंदोलकांवर लाठीमार करावा लागला. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यातही घेतले. सांगलीतील मिरजमध्ये तरुणांनी रिक्षाच्या काचा फोडल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी रिक्षाची तोडफोड करणाऱ्या तरुणांना चांगला चोप देत ताब्यात घेतले.
दरम्यान, जालन्यातील परतूर येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी नागरिक सुधारणा कायद्याविरोधात रेल्वे स्थानक परिसरातून विशाल मोर्चाही काढण्यात आला. हजारो नागरिकांचा या मोर्चात सहभाग पाहायला मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठाही सकाळपासून बंद होत्या.