नवी दिल्ली – गुंतागुंत वाढवणाऱ्या कृती टाळण्यासाठी आत्मसंयम दाखवल्यासच प्रादेशिक शांतता प्रस्थापित केली जाऊ शकेल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. “आसियान’देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत चीनच्या आक्रमकतेच्या संदर्भाने ते बोलत होते. या बैठकीला “आसियान’चे भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझिलंड, कोरिया, रशिया आणि अमेरिका या दक्षिण आशियातील सदस्य देशांचे संरक्षण मंत्री सहभागी झाले होते.
दहशतवाद हे अजूनही प्रादेशिक आणि जगासाठीही मोठे अरिष्ट आहे. दहशतवदाला सहाय्य आणि समर्थन करणारी यंत्रणा अजूनही अस्तित्वात आहे. भारताचे शेजारीही यात सक्रिय आहेत, असे पाकिस्तानच्या अप्रत्यक्ष उल्लेखाने राजनाथ सिंह म्हणाले आणि दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी आंतरराष्ट्रीय यंत्रणा “संयुक्तपणे आणि जोमाने’ सक्षम करण्याच्या कटिबद्धतेच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
भारत-प्रशांत भूभागामध्ये सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर राखणाऱ्या, शांततेने चर्चेच्या माध्यमातून वाद मिटवणारी खुली आणि सर्वसमावेशक यंत्रणा असावी, अशी भारताची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.
आम्ही आपसामधील विश्वासार्हता आणि विश्वास जपत आहोत. यामुळेच दीर्घकाळ शांतता कायम राखली जाऊ शकेल, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. भारत आणि चीनदरम्यान पूर्व लडाखमध्ये गेल्या 7 महिन्यांपासून तणाव आहे. दक्षिण चीन समुद आणि भारत-प्रशांत क्षेत्रात चीनच्या आक्रमक हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभुमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
स्वातंत्र्य, सर्वसमावेशकता आणि खुलेपणासमोरील आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाण्याच्या क्षमतेबाबत “आसियान’च्या व्यासापिठावर चर्चा होणे गरजेचे आहे. नियमावर आधारलेली यंत्रणा, सागरी सुरक्षा, सायबर गुन्हे आणि दहशतवाद आदी मुद्दयांवरही चर्चा अपेक्षित आहे. भारत-प्रशांत क्षेत्रात अनेक पारंपारीक आणि अपारंपारिक सुरक्षिततेचे धोके कायम आहेत, यावरही राजनाथ सिंह यांनी भर दिला.
जैव दहशतवाद, आंतरराष्ट्रीय तस्करी आणि साथीच्या रोगांचा धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी क्षमता वाढीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. करोनाच्या साथीमुळे उद्भवलेल्या समस्याही राजनाथ् सिंह यांनी अधोरेखित केल्या.