नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला 30 मे पासून सुरुवात झाली. मोदी यांनी 58 मंत्र्यांचे सरकार स्थापन करून कामाला प्रारंभ केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात 24 कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार असलेले 9 राज्यमंत्री, तर 24 राज्यमंत्र्याचा समावेश आहे. मोदींच्या केंद्रीय मंत्रिपदमध्ये सलग दुसऱ्यांदा नितीन गडकरी यांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला तसेच येणाऱ्या काळातील देशभरात महामार्गाच्या विकास कामाबद्दल त्यांनी पत्रकारांना आराखडा सांगितला.
दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच गडकरी शनिवारी सकाळी नागपुरात पोहोचले. यावेळी नागपूर विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. यात त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. मुंबई दिल्ली महामार्गाचं काम 2022 पर्यंत पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच त्यांनी देशभरात महामार्गाच्या शेजारी 125 कोटी वृक्षलागवड करण्याचा मानस असल्याचंही सांगितलं.