संगमनेर: उत्तर नगर जिल्ह्यासह सिन्नर तालुक्यातील सहा, अशा 182 गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या वितरण व्यवस्थेतून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे सायाळे, पाथरे, मळढोण, दुशिंगपूर या गावातील निळवंडे चाऱ्यांची कामे बाधित होण्याची शक्यता वाढली असून, येथील कलमे संगमनेर जलसंपदा विभागाने तातडीने हाती घ्यावी, अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीचे उपाध्यक्ष संजय गुंजाळ यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
निळवंडे कालव्यांचे अकोले तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या विरोधामुळे बंद आहे. बंद काम 10 जूनच्या आत सुरू करणार असल्याचे लेखी आश्वासन जलसंपदा विभागाने तळेगाव दिघे येथील रास्तारोको नंतर दिले. मुंबई-नागपूर हा जवळपास 56 हजार कोटींचा समृद्धी महामार्ग प्रकल्प मंजूर झाला असून, त्याचे भूसंपादनही पूर्ण होऊन सदरचा 2022 पर्यंत सरकारला पूर्ण करायचा आहे. त्यासाठी कामाचा वेग वाढविण्यात आला आहे. हा महामार्ग निळवंडे धरण प्रकल्पाच्या सिन्नर तालुक्यातील पाथरे, सायाळे, दुशिंगपूर या लाभक्षेत्रातील गावातून जात आहे. त्यामुळे या भागातील समृद्धी प्रकल्पाच्या आधी कालवे व चाऱ्या यांची कामे करणे गरजेचे आहे.
याबाबत निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, उपाध्यक्ष संजय गुंजाळ यांनी जलसंपदाच्या संगमनेर विभागीय कार्यालयात समक्ष भेट घेऊन या गावातील चाऱ्यांची कामे त्वरित करावीत, अशी मागणी केली आहे. जलसंपदाचे कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच सर्वेक्षण करून सदरची कामे मार्गी लावू, असे आश्वासन दिले आहे.