पुणे – राज्यात मोठा गाजावाजा करत दहा महिन्यांपूर्वी सुरू झालेली पशुगणना अखेर पूर्ण झाली असून पुणे जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागाचेही काम पूर्ण केल्याचा दावा, पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. मात्र, गेल्या तीन महिन्यांत राज्य शासनाकडून वारंवार देण्यात येणारी मुदतवाढ पाहता, खरच सर्व पशुगणना झाली का? प्रश्न उपस्थित होत आहे.
यावेळी राज्यात पहिल्यांदाच पशुगणना टॅबवर करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात या गणनेला सुरुवात झाली. मात्र, सर्व्हरच्या अडचणींमुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना गणना करताना अनेक अडथळे निर्माण झाले. त्यातच लोकसभा निवडणुकांमुळे पशुगणनेचे काम ठप्प झाले होते. एप्रिल अखेरपर्यंत पुणे जिल्ह्यातील पशुगणनेचे काम 80 टक्के पूर्ण झाले होते. त्यामुळे राज्य शासनाकडून पशुसंवर्धन विभागाला वारंवार विचारणा करून मुदतीमध्ये काम संपविण्याचे आदेश देण्यात आले. तीनवेळा मुदतवाढ दिली. मे 2019 अखेर जिल्ह्यातील पशुगणनेचे काम पूर्ण झाले. काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचा अहवाल जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे जमा केला आहे. तर काहींचे लवकर येतील. ते सर्व अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत.