नवी दिल्ली- येत्या दोन आठवड्यांच्या आत देशातील सर्व लवादांमधील रिक्त जागा भरण्यात याव्यात असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायिक आणि तांत्रिक अशा दोन्ही स्वरूपाच्या जागा भरल्या जाव्यात असेही कोर्टाने स्पष्ट केले असून ज्या जागा भरल्या गेल्या नाहीत त्याची कारणेही अहवालासह सादर करा अशी सुचनाही कोर्टाने केंद्राला केली आहे.
अनेक बाबी कोर्टापुढे जाण्याच्या आधी त्या लवादा मार्फत सोडवण्याची एक पद्धत देशात लागू आहेत. अशा प्रकारचे अनेक लवाद विविध विभागांसाठी नेमण्यात आले आहेत. पण गेले काही दिवस या लवादांवरील नियुक्त्याच केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे या लवादांचे काम पुर्ण रखडले आहे. अनेक याचिकाकर्ते त्यामुळे हताश झाले आहेत.
अनेक अपिले कोणत्याही सुनावणीविना पडून आहेत. त्याविषयी आधीच्या सुनावणीत न्यायालयाने केंद्र सरकारच्या या निष्क्रीयतेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आज झालेल्या सुनावणीच्यावेळी केंद्र सरकारचे वकिल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितले की, आम्ही येत्या दोन आठवड्यांच्या आत या नियुक्त्या करण्याचा प्रयत्न करू.
देशात सध्या विविध लवादांवरील 250 पदे रिक्त आहेत. सिलेक्शन कमिटीने त्यावरील नेमणुकांच्या शिफारशीही केंद्र सरकारला केलेल्या आहेत. पण सरकारला त्या नियुक्त्यांचा आदेशच काढायला जमलेले नाही.