सहकारनगर, दि. 6 (प्रतिनिधी) -आज पाणी येणार नाही.., याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची योग्य ती खबरदारी पुणे महापालिकेकडून घेतली जात नसल्यामुळे पुणेकरांची गैरसोय होत आहे. गेली दोन पाणीपुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सोसावा लागत आहे. तर, पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे. याबाबत राष्ट्रवादी अर्बन सेल तर्फे आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.
याबाबत राष्ट्रवादी अर्बन सेल पुणे शहर अध्यक्ष नितीन कदम म्हणाले की, पाणीपुरवठा बंद बाबत पुणे मनपा नेहमीच्या पद्धतीने प्रेस नोट काढून वृत्तपत्रांद्वारे आधीच नागरिकांना कल्पना देते. बहुतांश वृत्तपत्र याबाबतचे वृत्त देत नसल्यामुळे आजचा पाणीपुरवठा बंदची माहिती सर्वच नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे किमान आठवडाभर तरी असे वृत्त अगोदर देण्यात यावे.
धरणात मुबलक पाणीसाठा असताना पुणेकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पुणे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या या कारभारामुळे पुन्हा एकदा नागरिकांना मन:स्ताप सोसावा लागत आहे. याबाबत संबंधीत यंत्रणेची आपण त्वरित चौकशी करून योग्य ती कारवाई करावी तसेच अघोषित पाणी बंदपासून पुणेकरांची सुटका करावी, अशी मागणी राष्ट्रवादी अर्बन सेल पुणे शहरतर्फे करण्यात आली आहे.