‘मोदी-शहां’विरोधातील फसवणुकीच्या आरोपाची सुनावणी सुरु
रांची : येथील जिल्हा न्यायालयाने कालपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या फसवणुकीच्या आरोपपत्रासंदर्भात सुनावणीस सुरुवात केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ‘आम्ही सत्तेत आल्यास प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये १५ लाख रुपये जमा करू’ या आश्वासनाची पूर्तता न केल्याचा ठपका ठेवत विधिज्ञ एच के सिंग यांनी भारतीय दंड संहितेच्या ४१५ (फसवणूक), ४२० (बेईमानी) व १२३ (b) (लोकप्रतिनिधी कायदा) कलमांअंतर्गत पंतप्रधान मोदी यांच्यासह अमित शहा व रामदास आठवले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी रांची जिल्हा न्यायालयामध्ये कालपासून सुनावणीस सुरुवात करण्यात आली आहे. याबाबतचं वृत्त इंडिया टुडे या वृत्तसंकेतस्थळाने दिलं आहे.
काय आहेत एच के सिंग यांचे आरोप
या प्रकरणी तक्रार दाखल करणाऱ्या विधिज्ञ एच के सिंग यांनी आपली भूमिका मांडताना, “गृहमंत्री अमित शहांनी, भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात सुधारित नागरिकत्व कायदा लागू करण्याचा प्रमुख वायदा असल्यानेच हा कायदा देशामध्ये लागू केल्याचं म्हंटलं होतं. जर भाजपच्या जाहीरनाम्यातील सुधारित नागरिकत्व कायदा लागू करण्याचे आश्वासन पूर्ण होते तर मग भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन का पूर्ण होत नाही?” असा प्रश्न उपस्थित केला.
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार मतांसाठी खोटी आश्वासनं देता येत नाहीत व असं केल्यास तो लोकांची फसवणुक केल्याचा प्रकार ठरतो असं देखील सिंग म्हणाले.
मात्र एच के सिंग यांचा, ‘२०१४ लोकसभा निवडणुकांदरम्यान भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक नागरिकांच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन’ देण्यात आल्याचा दावा खोटा असून भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात अशाप्रकारचं कोणतंही आश्वासन देण्यात आलं नव्हतं.
दरम्यान, याबतची पुढील सुनावणी २ मार्च रोजी होणार असून एच के सिंग यांनी दाखल केलेली तक्रार ही केवळ प्रसिद्धी प्राप्तीसाठीची भपकेबाजी असल्याचं भाजपतर्फे सांगण्यात आलं आहे.